ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी – जुआन बेनावेंटे
पीसीइटीच्या पुणे बिजनेस स्कूल मध्ये ५ वी ॲग्री वाईज राष्ट्रीय परिषद संपन्न

पिंपरी, पुणे ( दि. ५ मार्च २०२६) पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला, तर कृषी उत्पादनात आणि दर्जा मध्ये निश्चित वाढ होत आहे. तसेच ॲग्रीवाईज परिषद मुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी मिळेल. त्यातून ग्रामीण विकासाचे ध्येय साध्य करता येईल. त्यासाठी अनुभव संपन्न शेतकरी, संशोधक, शेती उत्पादन विक्री करण्यासाठी असणारे वितरक, उद्योजक यांनी योग्य समन्वय साधला पाहिजे असे मार्गदर्शन स्नेल इंटिग्रल प्रा. लि. चे एपीएसी प्रमुख जुआन बेनावेंटे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पुणे बिजनेस स्कूल (पीबीएस) मध्ये “वाढती मूल्य आणि त्याचे सशक्तिकरण” या संकल्पनेवर आधारित “पाचवी ॲग्री वाईज राष्ट्रीय परिषद २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. कृषी व अॅग्रिबिझनेस क्षेत्रातील नवोन्मेष, शाश्वतता आणि भविष्यातील संधी या विषयांवर चर्चा करण्यासाठी देशभरातील उद्योग तज्ज्ञ, प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव रिकी थापर, एव्हीपी व स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्रमुख पुष्कल उपाध्याय, दीपक फर्टीलायझर अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनचे अमित खरे, न्यूट्रीवाईस ग्लोबल फूड ॲडव्हायझरी सर्विसेसचे अध्यक्ष अरबिंद दास, महाधन ॲग्रीटेक लि. चे वरिष्ठ व्यवस्थापक निधी सिंह, जप्फा कॉन्फिड इंडिया प्रा.लि.चे एचआर विनायक दर्पे, कान बायोसिस प्रा.लि. आंतरराष्ट्रीय व्यवसाय विकास व्यवस्थापक सागर अतुल शाह, फ्राटेली फ्रुट्स मुख्य कृषीतज्ञ विश्वजित मोरे, पीबीएस चे संचालक डॉ. गणेश राव, डीन डॉ. मिनाक्षी त्यागी, प्रा. सागर लोखंडे, प्रा. पूजा माणके आणि प्रा. प्राजक्ता सांधिकार आदी उपस्थित होते.

पीबीएस चे संचालक डॉ. गणेश राव यांनी सांगितले की, ही राष्ट्रीय परिषद उद्योजक आणि शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी यांच्या मध्ये अधिक भक्कम समन्वय करण्यासाठी, ज्ञान विनिमय आणि सहकार्याला चालना देण्यासाठी प्रभावी ठरली. यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्व सत्रांमधील सक्रिय चर्चा यांमधून भविष्यातील सक्षम अॅग्रि बिझनेस उद्योजक घडविण्याची संस्थेची बांधिलकी अधोरेखित झाली.
डीन डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी स्वागत, प्रास्ताविक करताना सांगितले की, ॲग्रीवाईज सारख्या उपक्रमांत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे शेती उत्पादनात शाश्वत वाढ होईल. त्यामुळे शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायांना आर्थिक पाठबळ मिळेल. यामुळे शेतकरी, संशोधक, उद्योजक, वितरक, व्यापारी आणि ग्राहक यांचे उत्कृष्ट नेटवर्क तयार होईल आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देता येईल असे उपक्रम पुढच्या पिढीला प्रेरणा देतील. तरुण उद्योजकांना शेती संबंधित व्यवसायात करिअर करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होईल. विचारांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे विचार करण्याचा नवा दृष्टिकोन प्राप्त होईल आणि या क्षेत्रातील आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल असे डीन डॉ.मिनाक्षी त्यागी यांनी सांगितले.
यावेळी मासिक ॲग्रीवाईज च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या मासिकामध्ये कृषी व अॅग्रिबिझनेस क्षेत्रातील संशोधनपर लेख, तज्ज्ञांचे विचार आणि उद्योग क्षेत्रातील अनुभवांचा समावेश करण्यात आला आहे.
पीबीएसचे संचालक डॉ. गणेश राव, डीन डॉ. मिनाक्षी त्यागी, प्रा. सागर लोखंडे, प्रा. पूजा माणके आणि प्रा. प्राजक्ता सांधिकार यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.
पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीबीएस चे संचालक डॉ. गणेश राव यांनी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले.
——————————————————————


