महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

मातंग समाजाला सिंहावलोकन करण्याची गरज – माजी आमदार सुधाकर भालेराव

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक न्याय समर्थन परिषदेत एकमुखी मागणी

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १३ जुलै २०२६) स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी मातंग समाजाने अनेक वर्षाचा लढा दिला आहे. पहिला लढा शाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ प्राप्त करण्यासाठी दिला. दुसरा लढा लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग प्राप्त करण्यासाठी दिला गेला. आता तिसरा आणि निर्णायक लढा आरक्षण मिळवण्यासाठी द्यायचा आहे. ही एक सामाजिक न्यायाची लढाई आहे. हा लढा देताना खूप संघर्ष करावा लागणार आहे यामध्ये यश मिळवण्यासाठी मातंग समाजाला सिंहावलोकन करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक न्याय समर्थन परिषदेत मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले.

मातंग सेवा संघ, भारतीय लहुजी पॅंथर आणि क्रांतिवीर विचारमंच या संस्थेच्या वतीने चिंचवड येथे रविवारी (दि.१२ जुलै) आरक्षण उपवर्गीकरणाच्या पाठिंब्यासाठी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाची “सामाजिक न्याय समर्थन न्याय परिषद” आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मातंग सेवा संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे होते. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक व भारतीय लहुजी पॅंथरचे अध्यक्ष संदीपान झोंबाडे, लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे आदींनी देखील मार्गदर्शन केले.

इतर समाजातील लोक मातंग समाजाला धार्मिकतेच्या नावाखाली अंधश्रद्धेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या समाजातील प्रगत झालेल्या लोकांनी मागे राहिलेल्या समाजाला पुढे नेण्यास मदत केली पाहिजे. इतर समाजाचे लोक आपण त्यांच्या बरोबरीला येऊ नये म्हणून या वर्गीकरणाला विरोध करण्याचे षडयंत्र करत आहेत. आपल्या समाजात विषमता आहे. पुढे गेलेली व्यक्ती मागच्या व्यक्तीला मदतीचा हात देत नाहीत. लवकरच लहुजी सैनिक दलाची स्थापना केल्याची घोषणा भाऊसाहेब आडागळे यांनी केली. या दलात सहभागी होण्यासाठी तरुणांनी संपर्क करावा असे आवाहन भाऊसाहेब आडागळे यांनी केले. आम्ही इतर समाजाचे आरक्षण मागत नाही. आमचा समाज पुढे जाण्यासाठी उपवर्गीकरणातून स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब आडागळे यांनी सांगितले.

आमच्या हक्काचे सामाजिक न्याय विभागाचे बजेट कुणाच्या पदरात पडले. ज्या समाजाचा मंत्री असेल त्यांनाच लाभ मिळतो. आम्हाला काहीच मिळाले नाही. आमच्या समाजासाठी शाळा नाही, नोकरी नाही, फक्त चतुर्थ श्रेणी ची जागा मिळते, ती पण कमी प्रमाणात. शिफारसी अनेक केल्या पण मंजूर काहीच नाही झाले समाज कल्याण विभागाने आदेश काढला पण जीआर निघाला नाही. दुसऱ्या समाजाचे आमदार त्यांच्या समाजासाठी काम करतात. आता जो लढा चालू आहे त्यामध्ये ६८ शिफारसी आहेत. त्यामध्ये उद्योग, भूखंड, शाळा, महिला, वस्तीगृह या गोष्टींचा समावेश होतो. त्या लागू व्हायला पाहिजेत. ही परिषद बुद्धिवादी लोकांची आहे. आरक्षणाची लढाई प्रभावीपणे लढावी लागेल. जातीसाठी एकत्रित या असे आवाहन संदिपान झोंबाडे यांनी केले.

मातंग समाजाचे मतदान दुसऱ्याच्या पारड्यात पडते. आपल्या समाजाचा कार्यकर्ता निवडून येत नाही. आता शांत बसायचे नाही. राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या समाजाला जागृत व्हावे लागेल, अभ्यास करावा लागेल, एकत्र यावे लागेल, तोपर्यंत समाजात काय चाललंय ते कळणार नाही, वेगवेगळी सरकारे आली पण त्यांनी काय केले, आमचे महामंडळ बंद केले. गेले ६ वर्ष आम्हाला आमचे बजेट मिळाले नाही आता सर्व मागण्या मान्य होईपर्यंत लढायचा निर्धार सर्वांनी केला आहे असे कैलास खंदारे यांनी सांगितले.

परिषदेच्या आयोजनात बापू पाटोळे, सविता आव्हाड, धीरज सकट, सचिन धूनगव, डी. पी. खंडाळे, रामदास कांबळे, सुरेश जोगदंड, नाना कांबळे, महादेव आडागळे, विजय कांबळे, कालिंदा एडके, शांताराम खुडे, लक्ष्मण आडागळे, आदींनी सहभाग घेतला होता.

स्वागत अविनाश शिंदे, सूत्रसंचालन विशाल कसबे यांनी केले तर आभार बापू वाघमारे यांनी मानले.
———————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button