महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक

देहू ते आळंदी पालखी मार्ग “संतभूमी” म्हणून जाहीर करा – अभय टिळक

या अधिवेशनात "संतभूमी" चा विषय मंजूर करून घ्या - हभप राजू महाराज ढोरे

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २३ जून २०२६) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी, देहू आणि टाळगांव चिखली, तळवडे या पंचक्रोशीस वारकरी संप्रदाय मनोभावे नमन करून “संतभूमी” मानतो. देहू ते आळंदी हा १६ किलोमीटर चा पालखी मार्ग राज्य सरकारने “संतभूमी” म्हणून जाहीर करावा अशी मागणी आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी केली.

पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभय टिळक बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, वारकरी संप्रदाय प्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी अभय टिळक यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे उत्तरांचल सरकारने “देवभूमी” नावाने काही परिसर जाहीर करून त्या परिसरास संरक्षण दिले आहे आणि तेथील पावित्र्य जपून विकास कामे केली आहेत. त्याच धर्तीवर देहू ते आळंदी या पंचक्रोशीतील परिसर संतभूमी म्हणून जाहीर करावा. तसेच या भूमीची सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक सुरक्षितता अखंड राखण्यासाठी शासनाने विशेष निधी देऊन विकास करावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीयमंत्री यांच्याकडे आम्ही करीत आहोत यासाठी आवश्यक तो पत्र व्यवहार व पाठपुरावा केला जात आहे.

हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन सोमवार पासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी “संतभूमी” चा विषय मांडून राज्य सरकार कडून मंजूर करून घ्यावा. पुढील महिन्यात होणाऱ्या पंढरपूर यात्रेच्या अगोदर महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्र विधान परिषद आणि विधानसभेचे सर्व आमदार, राज्यसभा व लोकसभेचे सर्व खासदार, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या परिसरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांना आम्ही “संतभूमी” जाहीर करण्याबाबतचे निवेदन देऊन पाठपुरावा करू. तसेच वारकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील याबाबत जनजागृती केली जाईल असे हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले.

डॉ. स्वाती मुळे यांनी सांगितले की, वाढत्या नागरीकरणामुळे या भागामध्ये मागील पंधरा वर्षात वेगाने शहरीकरण झाले आहे. संतपीठ हायस्कूल प्रमाणे अनेक शैक्षणिक संस्था या परिसरात कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतूक वाढली आहे. इंद्रायणी नदीच्या किनारी अनेक ठिकाणी प्रदूषित व अस्वच्छ पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे. ही पंचक्रोशी संतभूमी म्हणून जाहीर झाल्यानंतर या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल यासाठी आम्ही राज्य सरकारकडे प्रयत्न करीत आहोत.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button