डिजिटल वापर समस्यांवर जागरूकता हवी – प्रा. शिल्पा संधाने
पीसीसीओइआर येथे "डिजिटल वेलनेस" राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. १६ एप्रिल २०२६) तंत्रज्ञान युगात डिजिटल वेलनेसची मूलभूत संकल्पना आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजून घ्यावे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वाढत्या वापराने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकळत खूप परिणाम होत आहेत. डिजिटल वस्तूंच्या वापराचे अनेकांना व्यसन लागले आहे. डिजिटल वापराच्या समस्यांवर उपाय म्हणून डिजिटल जागरूकता विकसित व्हायला हवी असे मार्गदर्शन मानसशास्त्रीय समुपदेशक प्रा. शिल्पा संधाने यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) यांच्या गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत “डिजिटल वेलनेस” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. वृंदा आंबेकर, पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उपसंचालक प्रा. डॉ. राहुल मापारी, अकॅडमिक डीन डॉ. अर्चना चौगुले, कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. विजय कोतकर, प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्रा. शिल्पा संधाने यांनी सांगितले की, जास्त वेळ स्क्रीन टाइम, सोशल मीडियावर अवलंबित्व, एकाग्रतेत घट, झोपेचे विकार यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सुसंवाद कमी होऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. सहनशीलता, संवेदनशीलता कमी होऊन कुटुंबातच भांडण तंटा वाढत आहे. आपण स्क्रीन टाइम वर नियंत्रण ठेवू शकतो, डिजिटल डिटॉक्स चा अवलंब करायला हवा, वेळेचे योग्य नियोजन करून ऑफ लाइन उपक्रमांना प्राधान्य द्यायला हवे. सोशल मीडियाचा मर्यादित आणि सजग वापर करायला पाहिजे असेही मानसशास्त्रीय समुपदेशक प्रा. शिल्पा संधाने यांनी सांगितले.

यावेळी प्रा. वृंदा आंबेकर, पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उपसंचालक प्रा. डॉ. राहुल मापारी, अकॅडमिक डीन डॉ. अर्चना चौगुले, कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. विजय कोतकर, प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
प्रा. वृंदा आंबेकर यांनी सांगितले की, जागरूकते पासून कृतीकडे डिजिटल वेलनेसची संस्कृती निर्माण करणे, डिजिटल वेलनेस केवळ एक संकल्पना न राहता ती प्रत्यक्ष जीवनात कशी अंमलात आणता येईल याचा विचार करायला पाहिजे. आपल्याला डिजिटल साधनांच्या दुष्परिणामांची माहिती असणे पुरेसे नाही, तर त्या जाणिवेला प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे जास्त गरजेचे आहे. यासाठी आपण स्क्रीन टाइम मर्यादित ठेवून, नियमित डिजिटल ब्रेक घ्यायला हवा. सोशल मीडियाचा सजग आणि जबाबदारीने वापर करा. ऑनलाइन आणि ऑफ लाइन जीवनामध्ये संतुलन ठेवा. मानसिक आरोग्य जपण्यासाठी डिजिटल सवयींमध्ये सकारात्मक बदल करा. डिजिटल वेलनेसची संस्कृती निर्माण करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि समाजात एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी मिळून आरोग्यदायी डिजिटल वातावरण तयार करणे आवश्यक आहे.
डॉ. स्वाती राजपूत आणि प्रा. प्रतीक चोपडे यांनी समन्वय आयोजन केले.
—————————————————————–



