उपक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षकांची गरज – डॉ. संगीता गोळे
एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये ‘खोज’ या आंतर जिल्हा शिक्षक परिषद संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ४ मे २०२६) विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी सातत्याने आपल्या व्यापक अनुभवातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी कुतूहलाची ज्योत कायम तेवत राहील. आताच्या नव्या पिढीला अशा उपक्रमशील आणि प्रयोगशील शिक्षकांची गरज आहे, असे शैक्षणिक सल्लागार व मार्गदर्शक डॉ. संगीता गोळे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये “संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्ट ४” अंतर्गत ‘खोज’ या आंतर जिल्हा शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक येथील १५० पेक्षा जास्त शिक्षकांनी सहभाग घेतला होता. ‘जीवन कौशल्ये : आनंदी वर्ग खोल्यांकडे एक प्रवास’ या विषयावर आधारित या परिषदेचे हे दुसरे वर्ष होते. यावेळी डॉ. गोळे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, आशा एज्युकेशनल सोसायटीच्या प्रतिनिधी श्रुंगी दुबे, द ऑर्किड्स स्कूलच्या डॉ. नम्रता मजहिल, परीक्षक डॉ. लीना पिंपळे, डॉ. अमृता जोशी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, नाशिक येथील मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सलन्सच्या प्राचार्या शुभ्रा वर्मा, के. के. वाघ महाविद्यालयाचे प्रतिनिधी, द नॉलेज हॅबिटॅट स्कूल पुणे, सुरजबा विद्या मंदिर मुंबई, एम. पी. शाह इंग्लिश हायस्कूल मुंबई, अंतर भारती बालग्राम लोणावळा, आणि एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, पुणे यांच्यासह विविध शाळा महाविद्यालयातील १५० पेक्षा अधिक शिक्षक, प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. संगीता गोळे यांनी सांगितले की, बदलत्या सामाजिक, भावनिक गरजा आणि शिक्षकांचे भावनिक स्वास्थ्य याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होता कामा नये.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले की, ‘आपण का आणि कोणासाठी शिकवतो’ यावर विचार मंथन झाले पाहिजे. शिक्षणामुळे सूक्ष्म पण प्रभावी बदल होत असतो. अध्यापनातून उद्देशाकडे झालेल्या तत्त्वज्ञानात्मक परिवर्तनाचे ते प्रतीक असते. शिक्षकांनी धोरणांपलीकडे जाऊन शिक्षणाच्या मूळ उद्देशाचा विचार केला पाहिजे. आता विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणाऱ्या शाळांची गरज आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परीक्षक डॉ. लीना पिंपळे, डॉ. अमृता जोशी यांनीही मार्गदर्शन केले. परिषद यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन अभया रविशंकर आणि स्वलेहा मुजावर यांनी केले.
——————————————————————



